Saturday, November 26, 2011

Khandobache Navaratra खंडोबाचे नवरात्र

Khandobache Navaratra

Khandoba is KulDaivat of Maharashtra. Mainly khandoba’s (Mallari-Martand) devotees and temples are found in Maharashtra and Karanatak. Navaratra of Khandoba is celebrated from Margashirsha shukla Pratipada to Margashirsha shukla Shasti. This is year it is to be celebrated from 26th November 2011 to 30th November 2011. It is actually festival of six days that is shadrotsav however it is called as navaraatra. Khandoba is incarnation of God Shiva. Margashirsha shukla Shasti means Champa Shasti. Champa Shasti is the day when God Shiva appeared as Khandoba to kill demons Mani and Malla. These demons were very cruel and troubling rushies, munies, devotees and even gods also. Navaratra celebration: devotees worship khandoba on all these six days early in the morning. On all six days Nandadeep (Holy lamp) is kept burning in front of Khandoba’s Idol. Bel (holy leaf), Davana (holy small flowers) and Zendu flowers which are liked by Khandoba are offered at the time of worship. Bhandara is very important while worshiping Khandoba. Bhandara means powder of turmeric. On the day of Champa Shasti and for performing Kuldharma many families offer Rodaga (made up wheat flour), Thombara (made from flour of grains of cereal plant or jawar and then curd and salt is added in.), onion with its leaf, bringal bharit and garlic as a prasadam. Many devotees are on fast for all five days then on the sixth day i.e. on Champa Shasti they take their normal food along with prasadam. Aarati is also sung after worship on all six days. Divti and Budhali (special type of lamps) are used for aarati.


Khanderay Stotras and links. 
ShriMalahari Dhyanam 
Shri Malhari-Mhalasakant PratahSmaranam 
Shri Mallari Hrudaya 
Shri Khanderay AshtottarShatNam Stotram 
Khanderaiyachi Aarati

खंडोबाचे नवरात्र

 नमोमल्लारि देवाय भक्तानां प्रेमदायिने I
 म्हाळसापतिं नमस्तुभ्यं मैरालाय नमोनमः II
 मल्लारिं जगतान्नाथं त्रिपुरारिं जगद् गुरुं I 
मणिघ्नं म्हाळसाकांतं वंदे अस्मत् कुलदैवतम् II 
 श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे.
 मुख्यत्वेकरून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खंडोबाची उपासना जास्त केली जाते. 
खंडोबाचे नवरात्र हे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जाते. हा खरा षड्रोत्सव असतो. मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले. नवरात्राचे पांच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात. सहा दिवस देवापुढे नंदादीप ठेवतात. देवाला बेल, दवणा व झेंडूची फुले फार प्रिय आहेत म्हणून ती आठवणीने वाहतात. खंडोबाच्या उपासनेंत भंडारा फार महत्वाचा आहे. 
भंडारा म्हणजे हळदीची पूड. खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्टी या दिवशी ठोम्बरा (जोंधळे शिजवून त्यांत दही व मीठ घालतात.), कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यांत असतात. देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याचा विधि असतो. 
तळी भरणे म्हणजे एका ताम्हनात विड्याचे पान, पैसा, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताम्हन "सदानंदाचा येळकोट" किंवा "एळकोट एळकोट जय मल्हार" असे मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात. नंतर दिवटी व बुधली घेऊन आरती करतात. देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात.
खंडोबाची पांच प्रतिके: १) लिंग: हे स्वयंभू, अचल अगर घडीव असते. २) तांदळा: हि चल शिळा असून टोकाखाली निमुळती होत जाते. ३) मुखवटे: हे कापडी किंवा पिटली असतात. ४) मूर्ति: ह्या उभ्या, बैठ्या, घोड्यावर कधी धातूच्या किंवा दगडाच्याही आढळतात. ५) टांक: घरांत पूजेसाठी सोन्याच्या पत्र्यावर किंवा चांदीच्या पत्र्यावर बनविलेल्या प्रतिमा.
खंडोबा हि देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसास पावणारी आहे. त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्व आहे. 
काही सौम्य नवस: १) मौल्यवान वस्तू देवास अर्पण करणे. २) दीपमाळा बांधणे. ३) मंदिर बांधणे किंवा मंदिराचा जीर्णोद्धार करणे. ४) पायऱ्या बांधणे. ओवरी बांधणे. ५) देवावर चौरी ढाळणे. खेटे घालणे म्हणजे ठराविक दिवशी देवदर्शनास जाणे. ६) पाण्याच्या कावडी घालणे. ७) उसाच्या किंवा जोंधळ्याच्या ताटांच्या मखरांत प्रतीकात्मक देवाची स्थापना करून वाघ्या मुरळी कडून देवाची गाणी म्हणविणे. यालाच जागरण किंवा गोंधळ असेही म्हणतात. ८) देवाची गदा म्हणजे वारी मागणे. (देवाच्या नावाने ठराविक काळांत भिक्षा मागणे.) ९) तळी भरणे, उचलणे, दहीभाताची पूजा देवास बांधणे. १०) पुरण-वरण व रोडग्याचा आठवा रीतिनुसार नैवेद्य करून ब्राह्मण, गुरव व वाघ्या-मुरळी यांस भोजन घालणे. ११) कान टोचणे, जावळ, शेंडी आदी विधी करणे. खोबरे भंडारा उधळणे, देवाच्या मूर्ती विकणे.
दिन विशेष: रविवार हा खंडोबाचा मानण्यांत आलेला आहे. सोमवती अमावस्या, चैत्री, श्रावणी व माघी पौर्णिमा, चंपाषष्टी व महाशिवरात्र ह्या दिवसांना विशेष महत्व आहे. मल्हारी-मार्तंड हा शिवाचा भैरव अवतार मानला असल्याने रविवारला महत्व आले असावे. चैत्री पौर्णिमा हा मार्तंड-भैरवाचा अवतार दिन आहे. श्रावणी पौर्णिमेस मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला. माघी पौर्णिमा हा म्हाळसेचा जन्म दिवस आहे. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्टी या दिवशी खंडोबा, ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणी-मल्लाचा वध करून लिंगद्वय रूपाने प्रगट झाले.
महाराष्ट्र आणि कर्नाटकांतील बारा प्रसिद्ध स्थाने: महाराष्ट्र: १) कडे-कऱ्हे पठार, जेजुरी 2) निमगाव ३) पाली-पेंबर सातारा ४) नळदुर्ग (धाराशीव-उस्मानाबाद) ५) शेंगुड (अहमदनगर) ६) सातारे (औरंगाबाद) ७) माळेगाव कर्नाटक: १) मैलारपूर-पेंबर (बिदर) २) मंगसूल्ली (बेळगाव) ३) मैलारलिंग (धारवाड) ४) देवरगुडू (धारवाड) ५) मण्मैलार (बल्ळारी).
बरीचशी माहिती श्रीखंडोबा विशेषांक १९७८ "प्रसाद" या मासिकामधून साभार घेतली आहे.
खंडोबाची आरती, ध्यान, हृदय, प्रातःस्मरण,आणि अष्टोत्तरशत नाम

खंडोबाचे नवरात्र भाग २
खंडोबा हे अनेक कुटुंबे आपले कुलदैवत म्हणून मानतात. 
खंडोबाला मणि-मल्लाचा वध केला म्हणून मल्लारी (मल्हारी), मैलार, 
तसेच (म्हाळसाचादेवीचा पती म्हणून) म्हाळसाकांत , मार्तंडभैरव, किंवा  (स्कंद पर्वतावरील खंडा घेऊन दैत्याचा वध करणारा म्हणून) खंडोबा म्हणतात. 
स्कंद पर्वतावरील श्रीशंकर आपल्या खड्गासह मल्लासुराचा
वध करण्यास आला, त्यावेळी खड्गाला खंडा असे नांव पडले.
हा श्रीशंकरांचा अवतार खंडामंडित झाला म्हणून त्याला खंडोबा 
असे म्हणू लागले. 
खंडोबाची वेशभुषा: साधारणपणे विठ्ठलासारखी देहयष्टी, पांढरे धोतर,
डोक्याला रुमाल, अंगरखा, उपरणे असा साधाच वेष असतो. 
प्रमुख भक्ती: बेल-भंडार वाहणे हीच त्याची प्रमुख भक्ति होय. 
हळदपूड, सुक्या खोबर्‍याच्या वाट्या एकत्र करुन तो प्रसाद व 
" येळकोट येळकोट जय मल्हार "  हा गजर करतात. 
याचा अर्थ असा लावतात, की ' हे खंडेराया, सर्वत्र भरपूर अन्न-धान्य पिकू दे. ज्यायोगे सर्वत्र सुकाळ होईल आणि आम्हाला भरपूर दान-धर्म करता येईल.  
खंडोबाच्या हातांतील वस्तु: खंडोबाच्या चार हातांत खड्ग, त्रिशूळ, डमरु व रुधिर मुंडासह पानपात्र असते. जवळ कुत्रा असतो.
मानप्रमाणे प्रथम मान नंदीला, नंतर घोड्याला व नंतर कुत्र्याला असा असतो. 
देवस्थाने : महाराष्ट्रांत व कर्नाटकांत खंडोबाची बरीच देवस्थाने आहेत.
मोठ्या प्रमाणावर यात्रा भरणारी एकंदर प्रमुख अशी अकरा स्थाने आहेत. 
१) जेजुरी (पुणे) २) शेबुड (अहमदनगर) ३) निमगाव दावडी (पुणे)
४) सातारे (औरंगाबाद) ५) पाली-पेंबर (सातारा) ६) मंगसुळी (बेळगांव) ७) मैलारलिंग (धारवाड) ८) मैलार देवगुड्ड (धारवाड)
९) मण्णमैलार (बल्लारी ) १०) मैलापुर-पेंबर (बिदर) ११) नळदुर्ग-धाराशी (उस्मानाबाद).
१) जेजुरी हे गांव पुण्याच्या आग्नेयेस ३० मैलावर पुणे-पंढरपुर रस्त्यावर आहे. उंच डोंगरावरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे. या मंदिरांत असणार्‍या राममंदिरांत एक लेख आहे. त्याप्रमाणे हे स्थान ज्येष्ठ कृष्ण १३, शके १७९२ मध्ये श्री रामचंद्र मल्हार ढगे जोशी, बायजाबाईचे जेऊर यांनी बांधले असा उल्लेख आहे. गडकोटावर दोन्ही बाजूंनी उघड्या असणार्‍या ६३ ओर्‍या आहेत. 
२) नळदुर्ग: नळदुर्ग हे गांव सोलापूरच्या ईशान्येस साधारण ३० मैलावर आहे. असे सांगतात की या ठिकाणी खंडोबाची तीन स्थाने आहेत. शके १५३६ मध्ये एक स्थान किल्ल्यांत होते. असे कागदपत्रांत आहे.
नळदुर्ग गावाच्या उत्तरेस दोनएक मैलांवर दोन स्थाने जवळ जवळच आहेत. अहिल्याबाईने बांधलेले देवालय आज प्रसिद्ध आहे. सुमारे तीन मैलांवर अणदूर गांवी खंडोबा वसतीस असतो असे भक्त मानतात.   
३) पाली: पाली हे गाव सातारा-कोल्हापूर रस्त्यावर सातार्‍यापासून १५ मैलावर आहे. सातारा तालुक्यांतील अतीत या गावाजवळ ते ५ मैलावर कर्‍हाड तालुक्यांत आहे. या मंदिर्‍याओवरींत एक शिलालेख आहे. हे देवस्थान शके १६९४ मध्ये चैत्र वद्य १३, गुरुवार या दिवशी श्री. गणेश खंडो व श्री महिपत खंडो पारगावकर यांनी बांधले.
४) मंगसुळी: मंगसुळीचे हे देवस्थान बेळगांव जिल्ह्यांत अथणी तालुक्यांत आहे. येथे अश्विन महिन्यांत मोठी यात्रा भरते आणि अश्र्विन शुद्ध द्वादशीस भंडारा होतो. या ठिकाणी वाघ्या साखळदंड तोडतो. व त्यावरुन भविष्यही वर्तविले जाते.
५) सातारे: हे गांव औरंगाबाद स्टेशनपासून २ मैलांवर आहे. येथे चंपाषष्ठीला फार मोठी यात्रा भरते.
६) मैलारलिंग: हे स्थान धारवाडपासून सुमारे २ मैलावर आहे. उंच टेकडीवरील हे देवस्थान पूर्वाभिमुख आहे.
७) देवरगुड्ड: पुणे-बंगलोर मार्गावर पुण्यापासून साधारणपणे ४०० मैलावर देवरगड्ड हे स्टेशन आहे. तेथून डोंगरावरील हे देवस्थान ४ मैलावर आहे. हे देवस्थान चुन्या-मातीचे आहे. मंदिराची शिखरे खुजी वाटतात. या देवस्थानास शके १६३८ ते १७६७ पर्यंत अनेक देणग्या मिळाल्याचे शिलालेख व कागदपत्रे आहेत.  
खंडोबा अवतार चरित्रातील प्रमुख खंडोबा क्षेत्र
श्री क्षेत्र जेजुरी
जेजुरी हे सह्याद्री च्या कुशीत वसलेले गाव साक्षात मल्हारीच येथे नांदतो आहे.श्री शंकराने मार्तंड भैरव अवतार इथेच धारण केला. दक्षिणे मध्ये मणि मल्लाचा संहार केल्या नंतर आपली राजधानी ही येथेच वसवली. मार्तंड भैरवाच्या मुळ अवतार ठिकाणाला
म्हणजेच सह्याद्री च्या या डोंगररागांना जयाद्री नाव लाभले. आणि काळाचे ओंघात त्याचे जेजुरी झाले.
या मल्हारीस हळद प्रिय म्हणून येथे येणारा प्रत्येक भक्त मुक्त हाताने हळदचूर्ण उधळीत असतो, उत्सवा मध्ये तर सारा आसमंत व परिसर भंडाराने सुवर्णमय होतो म्हणूनच जेजुरीला सुवर्णनगरी म्हटले जाते. 

श्री क्षेत्र पाली
खंडोबा म्हाळसा यांची विवाह भुमी साक्षात खंडोबा म्हाळसा येथे विवाहबद्ध झाले, सातारा जिल्ह्यात तारळी नदी काठी वसलेला निसर्गरम्य गाव नेहमी भक्तांनी फुललेला असतो, आजही पौष महिन्यात खंडोबा म्हाळसा यांचा विवाह येथे संपन्न होतो, मुळात या गावचे नाव राजापुर येथे पालाई नावाची एक गवळण राहत होती तिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा येथे लिंगरूपाने प्रगट झाले तिच्या नावावरूनच या गावास पाल अथवा पाली हे नाव प्राप्त झाले
श्री क्षेत्र नळदुर्ग / अणदूर
नळदुर्ग व अणदूर ही दोन गावे ऐतिहासिक वारसा सांगणारी आहेत, या दोन ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत, अणदूर येथे खंडोबा वर्षातील १०.२५ महिने व नळदुर्ग येथे १.७५ महिने वास्तव्य करतात असे मानले जाते, या मुळे हे खंडोबाचे एकच स्थान मानले जाते. श्री खंडोबा व बाणाई यांचा विवाह येथेच संपन्न झाला, येथील नळराजाची पत्नी दमयंती ही खंडोबा भक्त होती तिचे भक्ती मुळे खंडोबा प्रथम या ठिकाणी आले, उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासुन ५८ किमी व सोलापूर पासुन ४८ किमी अंतरावर नळदुर्ग आहे, नळदुर्ग मधून महामार्गाने सोलापूर कडे जाताना ४.५ किमी वर दक्षिणेकडे अणदूर कडे जाणारा रस्ता लागतो, मंदिरांची झालेली स्थलांतरे, यात्रांचे बदलेल्या जागा व अनेक धार्मिक संघर्ष आणि इतिहासाची पार्श्वभुमि असणारी ही भुमि इतिहासाच्या पाउल खुणा घेउन नांदत आहे.
श्री क्षेत्र मृणमैलार
खंडोबा कर्नाटक मध्ये मैलार या नावाने ओळखला जातो. हे गाव येथील मैलार मंदिरा साठी प्रसिद्ध असल्याने या गावास मैलार हेच नाव प्राप्त झाले आहे. या गावास मृणमैलार या नावानेही ओळखले जाते. येथील मंदिरातील मैलाराची मुर्ती माती पासुन बनवलेली आहे अशी लोक श्रद्धा आहे या मुळे मृणमैलार असेही म्हणतात. हा परिसर खंडोबा व मणि मल्ल दैत्य युद्ध भुमि आहे व याच ठिकाणी मार्तंड भैरवने मणि मल्ला चा वध केला व लिंग रूपाने वास केला येथे ऋषीमुनी नी मातीच्या मैलाराची मुर्ती बनवली तीच ही मुर्ती असल्याचे स्थानिक लोक सांगतात. मृणमैलार कर्नाटक राज्यातील बल्लारी जिल्ह्यात तालुक्याचे ठिकाण असलेल्या हाडगल्ली पासुन ४० किमी अंतरावर आहे. गुंतल व राष्ट्रीय महामार्ग क्रं ९ वरील राणीबेनुर येथून ३४ किमी आहे.
श्री क्षेत्र देवरगुड्डा
देवरगुड्डा हे कर्नाटकातील मधील गाव मैलार मंदिरासाठी म्हणजेच खंडोबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे या गावाचे मुळनाव गुडगुड्डापूर म्हणजेच टेकडीवरील गाव पण येथील मंदिरामुळे देवाचे टेकडी वरील गाव म्हणून देवरगुड्डा झाले. खंडोबाने ज्या मणि मल्ल राक्षसांचा वध केला त्या राक्षसांचे राजधानीचे हे गाव त्यांचे मृत्यू समयीचे विनंती वरून देवाने त्यांचे प्रेतासन करून येथे वास केला अशी जनश्रुती आहे. टेकडीवर वसलेले हे गाव सुंदर आहे देवरगुड्डा कर्नाटक राज्यात असुन राष्ट्रीय महामार्ग ९ वर धारवाड कडून बंगलोर कडे जाताना मोतीबेनुर गावाचे पुढे ९ किमी अंतरावर रस्त्याचे पुर्व बाजुस देवरगुड्डा कडे जाण्यासाठी कमान दिसते येथून ८ किमी अंतरावर देवरगुड्डा आहे राणीबेनुर - गुंतल रस्त्यावर देवरगुड्डा असल्याने या मार्गावरून ही येथे पोहचता येते.
श्री क्षेत्र आदिमैलार
आदिमैलार हे कर्नाटक मधील खंडोबाचे प्रसिद्ध क्षेत्र कर्नाटक मध्ये खंडोबा मैलार या नावाने ओळखला जातो, खंडोबा विषयक आद्य ग्रंथ ' मल्हारी महात्म्य ' याची ही जन्म भुमि या ग्रंथात शेवटी या क्षेत्राचे वर्णन करण्यात आलेले आहे. ज्या ऋषी मुळे शंकराने मार्तंड भैरव अवतार धारण केला त्यांची ही तपोभूमी या मुळे या क्षेत्रास आदिमैलार म्हटले जाते आदिमैलार कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यात बिदर पासुन २० किमी अंतरावर आहे हे मंदिर सपाटीवर असुन गाडी रस्त्याने थेट मंदिरा पर्यंत पोहचता येते. मंदिरास प्रशस्थ आवार असुन कोटाचे पुर्वद्वार भव्य आहे 

खंडोबाची उपासना:  खंडोबाचे उपासक मार्गशीर्ष प्रतिपदेपासून मार्गशीर्ष षष्ठीपर्यंत सटीचे नवरात्र म्हणून कुळधर्म पाळतात. प्रतिपदेला सकाळी लवकर उठून सडा-संमार्जन करावे. नंतर नवरात्र बसविणार्‍याने स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. 
खंडोबाची पूजा: खंडोबाची तांदळा, शिवलिंग व चतुर्भुज मूर्ती या तिन्ही रुपकांची पूजा होते. बरोबर कुत्रा व घोडे मात्र असतातच. लग्नसमारंभांतच खंडोबाचा टाक घेतात. घरी त्याच टाकावर नवरात्र बसविले जाते. देवाची स्वच्छता, घासपूस करुन पूजा करावी. 
कापूर-चंदनमिश्रीत पाणी एका भाड्यांत घेऊन ते पूजेसाठी वापरावे. पूजा करतांना सुगंधि फुले, गुलाल, व भंडार वहावा. भंडार लावलेले तांदूळाचे दाणे वहावेत.  पूजा करतांना देवाला प्रिय तांबडी, निळी, पांढरी कमळे व इतर त्या रंगाची फुले, पारिजातक, झेंडूची, मालती फुले अर्पण करावीत. 
पत्री : पत्री म्हणून देवाला नागवेलीची पाने, बिल्वपत्रे, हळदीची पाने, अशोकपत्रे, तुळसीपत्रे, दुर्वांकुरपत्रे, आंब्याची पाने, जाईची, कवठाची, जांभळीची, सबजाची पाने देवास विशेष प्रिय आहेत असे मल्हारी महात्म्यामध्ये म्हटले आहे. मिळतील ती पत्री-पाने देवास वहावी. 
देवासमोर सुगंधी धूप जाळावा. उत्तम वस्त्रे, अलंकार देवास अर्पण करावेत.  देवासमोर वाटींत दूध ठेवावे. त्रयोदशगुणी पानाचा विडा देवाला अर्पण करावा. 
देवावर पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधतात.
देवाजवळ अखंड तेला-तूपाचा नंदादीप सहाही दिवस तेवत ठेवतात. देवाला रोज माळ वाहतात, देवाची रोज पूजा, नैवेद्य व आरती करतात. आरतीसाठी पीठाचे दिवेही केले जातात.  
सहा दिवसांपैकी एका दिवशी तरी उपवास करावा. मल्हारी महात्म्याचे, मल्हारी स्तोत्रांचे श्रवण नवरात्राच्या या दिवसांत फार फलदायी होते.
महानैवेद्य: सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य , वांग्याचे भरीत-बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवितात. 
खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून आठ महिने वांगी चालतात. महाराष्ट्रांत चातुर्मासांत कांदा, लसूण, वांगी वर्ज्य असतात. 
कांदा फक्त चंपाषष्ठीच्याच दिवशी चालतो. 
चंपाषष्ठीस ब्राह्मण-सुवासीनीस भोजन, वाघ्या-मुरळींस भोजन घालावेच भोजनानंतर त्यांना पानविडा-दक्षिणा देऊन नमस्कार करावा. तसेच खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही खाऊ घालावे. सटीच्या दिवशी देवासाठी तेल व नैवेद्य नेतात. तळी भरणे-उचळणे हाही नवस प्रकार करतात. नंतर नवरात्र उठवतात. 
वारी मागणे.
काही घरांतून चंपाषष्ठीच्या दिवशी वारी मागण्याची पद्धत आहे. या दिवशी नैवेद्य म्हणून पुरणपोळी करतात. जेवावयास ब्राह्मण, वाघ्या-मुरळीस बोलावतात. जेवण वाढले की घरांतील सर्वजण ब्राह्मण, वाघ्या-मुरळीकडून ' वारी खंडोबाची ' म्हणून त्यांच्या पानांतून पुरणपोळी घेतात आणि ती प्रसाद म्हणून खातात.
वारीचा अजुनही एक प्रकार म्हणजे खंडोबाच्या रविवार या पवित्र दिवशी काही घराण्यांत वारी मागतात. ताम्हण घेऊन पाच घरी ' वारी खंडोबाची ' म्हणून ओरडतात. साधारणपणे कोरडे पीठ वारींत दिले जाते. त्याची घरी येऊन भाकरी बनवून ती घरांतील सर्वजण प्रसाद म्हणून खातात. यामुळे अशा घरास खंडोबा अन्न-धान्याची कमतरता कधीच भासू देत नाही असा समज आहे.  
दान-धर्म: या नवरात्रांत आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी म्हणून दान-धर्म करावा. अन्नदानास फार महत्व आहे. कुंकू-अक्षतांसह पान-विडा द्यावा.      
दिवटी-बुधले: दिवटी- बुधले याचे महत्व असे आहे की मणिमल्लाचा वध केल्यानंतर देवाच्या ठिकाणी अंधार होता तो जावा म्हणून भक्तांनी उजव्या हातात सोन्याचे, पितळ्याची किंवा लोखंडाची दिवटी घेऊन ती पेटवावी आणि देवास ओवाळावे. ओवाळताना पायापासून डोक्यापर्यंत देवास ओवाळावे. नंतर दिवटी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने पूजा करावी. नैवेद्य झाल्यावर ती दिवटी दुधांत शांत (विझवावी.) करावी. 
व ते दूध सर्वांनी तीर्थ म्हणून घ्यावे. 
लग्नकार्यांत अगर नंतर गोंधळ घालणे म्हणजेच मल्हारीची स्तुतीपर गाणी गाणे, ऐकणे, देवास त्यासाठी पाचारण करणे. याही प्रचलीत प्रथा आहेत. 
खंडोबाचे नवरात्र भाग ३
खंडोबाचे षड्रात्र उत्सव म्हणजे काय? घटस्थापना कशी करावी ?
॥ चंपाषष्ठी दिवसी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी ॥
॥ चंपाषष्ठी चा करिती जे करिती कुळधर्म त्याचे होत आहे परिपूर्ण धर्म ॥
चंपाषष्ठी श्रीखंडेरायाच्या उपासनेतील अत्यंत महत्वपूर्ण उत्सव, श्रीमल्हारी मार्तंडाचे षडःरात्रोत्सावाचा सांगता दिवस या दिवशी मार्तंड भैरवाने मल्लासुर दैत्याचा संहार केला व भूतलावरील अरिष्ठ टाळले. विजायोत्सावामध्ये देवगणांनी मार्तंड भैरावावर भंडारा बरोबरच चंपावृष्टी अर्थात चाफ्याची पुष्पवृष्टी केली म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला चंपाषष्ठी असे नाव मिळाले. 
आपल्या घरातील सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनाचा आनंद मिळावा, तसेच आपल्यावर येणारी संकटे नाहीशी व्हावीत यासाठी षडःरात्रोत्सव कालावधीत आपल्या घरामध्ये रूढी प्रमाणे कुळधर्म कुलाचार पाळावेत. मांसाहार, मद्यपान करू नये, विषयाच्या आहारी जावू नये. घरामध्ये व्रत पाळावे, उपवास करावा ,आचरण शुद्ध ठेवावे. घरातील वातावरण मंगलमय आणि प्रसन्न राहील यासाठी सर्वांनी कटाक्षाने प्रयत्न करावेत.
साहित्य:
कुंभ कलश, विड्याची पाने, सुपारी, छोटी नाणी, कलशाला बांधण्यासाठी दोरा, धूप-दीप, गुगुळ, कुंकू, हळद, अक्षता, गुलाल, पंचामृत इत्यादी पूजेचे साहित्य अमावस्येच्या दिवशीच जमवुन ठेवावे. 
प्रतिपदेला प्रात:काली उठुन स्नानादि आटोपुन सर्व देव टाक पंचामृताने प्रक्षालित करुन देवघर स्वछ करुन घ्यावे. चंदन पाट किंवा चौरंगावर नवीन वस्त्र टाकुन कुळाचाराप्रमाने माती; अथवा भंडार पात्रामधे पाण्याचा कलश ठेऊन त्यावर नागवेलीची पाने नारळ ठेवुन विधीवत् घटस्थापना करावी.घटाच्या डाव्या बाजुस जोड पानावर म्हाळसा देवीच्या प्रित्यर्थ सुपारी ठेवावी. व उजव्या बाजुस जोडपानावर बानु देवीच्या प्रित्यर्थ सुपारी पुजन करावे.
नवरात्रीमध्ये अखंड ज्योत लावतो तशीच षड्रात्र उत्सवातही देवासमोर अखंड ज्योती प्रज्वलीत करावी परंतु तत्पूर्वी या गोष्टी लक्षात ठेवाव्यात...
1. षड्रात्र उत्सवात देव खंडेरायाच्या घटासमोर सहा दिवस अखंड ज्योत लावली जाते. देवासमोर एक तेलाची आणि एक शुद्ध तुपाची ज्योत लावावी.
2. मंत्र महोदधि (मंत्राच्या शास्त्र पुस्तका) नुसार अग्नीसमोर करण्यात आलेल्या जपाचा साधकाला हजारपट जास्त फळ प्राप्त होते. असे म्हटले जाते की, दीपम घृत युतम दक्षे, तेल युत: च वामत:।
अर्थ - तुपाचा दिवा देवाच्या उजव्या बाजूला आणि तेलाचा दिवा देवाच्या डाव्या बाजूला ठेवावा.
3. अखंड ज्योत संपूर्ण सहा दिवस प्रज्वलित राहणे आवश्यक आहे. यासाठी एका छोट्या दिव्याचा उपयोग करावा. अखंड दिव्यामध्ये तेल, तूप टाकायचे असल्यास किंवा वात ठीक करायची असल्यास छोटा दिवा अखंड दिव्याच्या मदतीने प्रज्वलित करून बाजूला ठेवावा.
4. अखंड दिवा ज्योत ठीक करताना विझला तर छोट्या दिव्याने अखंड दिवा पुन्हा प्रज्वलित करावा.
सहा दिवस घटावरती वेगवेगळ्या फुलांच्या माळा टांगाव्यात. मंत्र जप जागरण , भजन , गायन करावे.चंपाषष्ठीच्या दिवशी देवाला पुरणावरणाचा नैवेद्य तसेच वांग्याचे भरीत भाकरीचे रोडगे असा नैवेद्य दाखवावा. तळीभंडार करुन घटोत्थापन करावे.
या सहा दिवसात मार्तंड भैरव स्तोत्राचे , मल्हारी विजय ग्रंथांचे वाचन करावे.


            Khandobache Navaratra


Custom Search

No comments: