Friday, December 2, 2016

Dasbodha दासबोध दशक १ समास १


Dasbodha Dashak Pahila 
Samas Pahila GranthaRambha 
Dasbodha is in Marathi. It is a beautiful creation of Swami Samarth Ramdas. In this first Dashak First Samas it is told that waht is the name of this Granth. Why it is written and what is its' falshruti.
समास पहिला ग्रंथारंभ
श्रीराम ॥
श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ ।
श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥ 
मराठी अर्थ 
श्रोत्यांचे प्रश्र्ण:
१) आरंभींच श्रोते प्रश्र्ण विचारतात कीं, " हा ग्रंथ कोणता ? त्यांत काय सांगितलें आहे ? आणि त्याचा अभ्यास केल्यानें काय फळ मिळेल ?" 
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । 
येथ बोलिला विशद । भक्तिमार्ग ॥ २ ॥  
२) श्रीसमर्थ उत्तर देतात कीं, " या ग्रंथाचे नांव आहे दासबोध. गुरु व शिष्य यांच्या संवादरुपानें हा ग्रंथ लिहिला असून त्यामध्यें भक्तिमार्गाचें स्पष्ट विवेचन आहे, " 
नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्याचें लक्षण ।
बहुधा अध्यात्मनिरोपण । निरोपिलें ॥ ३ ॥
३) दासबोधामध्यें नवविधा भक्ति, ब्रह्मज्ञान व वैराग्य यांचें लक्षण सांगितलें आहे. तें सांगतांना आत्मविद्येच्या अनेक अंगांचें विवेचन जागोजागी केलेलें आहे. 
भक्तिचेन योगें देव । निश्र्चयें पावती मानव ।
ऐसा आहे अभिप्राव । ईये ग्रंथी ॥ ४ ॥
४) भक्तीच्या मार्गानें जाणार्‍यास ईश्र्वराचे दर्शन हमखास घडतें असा या ग्रंथाचा स्पष्ट अभिप्राय आहे.
मुख्य भक्तीचा निश्र्चयो । शुद्ध ज्ञानाचा निश्र्चयो ।
आत्मस्थितीचा निश्र्चयो । बोलिला असे ॥ ५ ॥
५) उत्कृष्ट भक्ति कोणती, ज्यास अज्ञानाचा स्पर्श नाहीं असें शुद्ध ज्ञान कोणतें, आत्मस्थिति कशी असते याचा निर्णय येथें केला आहे.
शुद्ध उपदेशाचा निश्र्चयो । सायोज्यमुक्तिचा निश्र्चयो ।
मोक्षप्राप्तीचा निश्र्चयो । बोलिला असे ॥ ६ ॥ 
६) त्याचप्रमाणें शुद्ध उपदेश कसा असतो, सायुज्यमुक्ति कशाला म्हणतात, मोक्षप्राप्तीचे लक्षण काय, 
शुद्ध स्वरुपाचा निश्र्चयो । विदेहस्थितीचा निश्र्चयो ।
अलिप्तपणाचा निश्र्चयो । बोलिला असे ॥ ७ ॥
७) शुद्ध आत्मस्वरुप कसे कसें, विदेहस्थिति कोणती, अलिप्तपणा म्हणजे काय, 
मुख्य देवाचा निश्र्चयो । मुख्य भक्ताचा निश्र्चयो ।
जीवशिवाचा निश्र्चयो । बोलिला असे ॥ ८ ॥
८) सर्व देवांचा देव कोणता, उत्तम भक्त कोण, जीव आणि शिव यांचे स्वरुप काय, 
मुख्य ब्रह्माचा निश्र्चयो । नाना मतांचा निश्र्चयो ।
आपण कोण हा निश्र्चयो । बोलिला असे ॥ ९ ॥
९) सर्वोत्तम ब्रह्म कसें, अनेक प्रकारचीं मतें व मतांतरें कोणती, आणि खरा मी कोण- या सर्व विषयांचें स्पष्ट, स्वच्छ, सरळ आणि निःसंशय स्वरुप दासबोधांत सांगितले आहे.
मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्वलक्षण ।  
नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ॥
१०) दासबोधांत आलेले आणखी विषय-- वर सांगितल्या विषयांबरोबरच उपासनेचें मुख्य लक्षण, नाना प्रकारच्या काव्यांचीं लक्षणें, नाना प्रकारच्या चतुरपणाचीं लक्षणें, 
मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचें लक्षण । 
कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥ 
११) शिवाय मायेच्या उत्पत्तीचें लक्षण, पंचमहाभूतांचीं लक्षणें, आणि या सृष्टीचा कर्ता कोण व त्याचें लक्षण कोणतें-- या सर्वांचें निःसंदिग्ध वर्णन दासबोधामध्यें केलें आहे.
नाना किंत निवारिले । नाना संशयो छेदिले ।
नाना आशंका फेडिले । नाना प्रश्र्ण ॥ १२ ॥
१२) दासबोधांत अनेक शंकांचे निवारण आहे. अनेक विकल्पांचे व भ्रमांचे म्हणजे चुकीच्या समजुतीचें निवारण येथें केलें आहे. अनेक संशय छेदून टाकले आहेत. त्याचप्रमाणें अनेक आक्षेपांना व प्रश्नांना समाधानकारक उत्तरें दिलीं आहेत.
ऐसें बहुधा निरोपिलें । ग्रंथगर्भीं जें बोलिलें ।
तें अवघें चि अनुवादलें । न वचे किं कदा ॥ १३ ॥
१३) दासबोधाची रचना कशी: अशा पद्धतीचें अनेक विषयांचे विवेचन दासबोधांत आलें आहे. 
तथापि अवघा दासबोध । दशक फोडून केला विशद ।
जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥
१४) सबंध दासबोध वीस दशकांत विभागला असून प्रत्येक दशकांत दहा समास आहेत. प्रत्येक दशकाचा विषय त्या त्या दशकांत सांगितला असल्यानें सगळा दासबोध स्पष्ट करुन मांडला गेला आहे. 
नाना ग्रंथांच्या समती । उपनिषदें वेदांत श्रुती ।
आणि मुख्य आत्मप्रचीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥
१५) दासबोधाचे आधारग्रंथ: दासबोधांतील विषयविवेचनास अनेक ग्रंथांचे आधार घेतले आहेत. त्यांमध्यें उपनिषदें, ब्रह्मसूत्रें आणि वेद हे आधार महत्वाचे आहेत. परंतु या शास्त्रप्रचीतीबरोबर प्रामुख्यानें आत्मप्रचीतीचाच म्हणजे स्वानुभवाचाच खरा आधार घेतला आहे. 
नाना समतीअन्वये । म्हणौनि मिथ्या म्हणतां न ये ।  
तथापि हें अनुभवासी ये । प्रत्यक्ष आतां ॥ १६ ॥
१६) मत्सरी लोकांची टीका: अनेक प्रकारचे आधार घेऊन मांडलेला दासबोधांतील विषय खोटा किंवा चुकीचा म्हणतां येणार नाहीं. तरी त्यास खोटा व चूक म्हणणारे निघतात हे प्रत्यक्ष अनुभवास येतें. 
मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघे चि ग्रंथ उछेदती ।
नाना ग्रंथांच्या समती । भगवद्वाक्यें ॥ १७ ॥
१७) मत्सरी माणसे यास खोटा म्हणतील. पण तसें म्हणत असतां सर्व थोर आधारग्रंथांना व प्रत्यक्ष भगवंताच्या वचनांना, अर्थांत सगळ्या वेदान्त ग्रंथांना, खोटें मानावें लागेल हें त्यांच्या ध्यानांत येत नाहीं.      
शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता ।
उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदांत ॥ १८ ॥
१८) आधार ग्रंथांची नामावली: शिवगीता, रामगीता, गुरुगीता, गर्भगीता, उत्तरगीता, अवधूत गीता, वेद आणि वेदान्त किंवा शारीरभाष्य,
भगवद्गीता ब्रह्मगीता । हंसगीता पांडवगीता ।
गणेशगीता येमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥
१९) भगवद्गीता, ब्रह्मगीता, पांडवगीता, गणेशगीता, यमगीता, उपनिषदें, भागवत, 
इत्यादिक नाना ग्रंथ । समतीस बोलिले येथ ।
भगवद्वाक्यें येथार्थ । निश्र्चयेंसीं ॥ २० ॥
२०) इत्यादि अनेक ग्रंथांचा आधार घेऊन हा दासबोध लिहिला आहे. प्रथम कोणत्याहि विषयाचे स्वरुप विवेकानें निश्र्चित केले आहे. नंतर त्यास आधार देणारी व बरोबर तसाच अर्थ असणारी भगवंताची वचनें घेतली आहेत.
भगवद्वचनी अविश्र्वासे । ऐसा कोण पतित असे ।
भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणें येथीचें ॥ २१ ॥
२१) दासबोधांतील विषयप्रतिपादन भगवंताच्या मतास अनुसरुन आहे. भगवंताच्या सांगण्यावर विश्वास न ठेवणारा असा कोणी क्षुद्र व हीन माणूस असेल असें वाटत नाही. 
पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगा च ठेवी जो दूषण ।
तो दुरात्मा दुराभिमान । मत्सरें करी ॥ २२ ॥
२२) क्षुद्र टीकाकार व त्यांची टिका: एखादा ग्रंथ आरंभापासून शेवटपर्यंत न वाचतां जो मनुष्य त्याला उगाच नांवें ठेवतो तो दुष्टबुद्धीचा असतो. केवळ मत्सराने आपला दुराभिमान, आपली हीन वृत्ती तो प्रगट करतो. 
अभिमानें उठे मत्सर । मत्सरें ये तिरस्कार ।
पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥
२३) दुष्ट अभिमानाने मत्सर निर्माण होतो, मत्सरांतून तिरस्कार प्रगट होतो आणि त्यांतुन मग तीव्र क्रोधाचा विचार पोसला जातो. 
ऐसा अंतरी नासला । कामक्रोधें खवळला ।
अहंभावें पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥
२४) अशारीतीनें ज्याचें मन विकृत झालें आहे, ज्याच्या अंतर्यामीं कामक्रोध खवळलेले असतात तो केवळ अहंकाराने या नासक्या मनःस्थितीला पोंचतों असें जगांत प्रत्यक्ष आढळतें. 
कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला ।
अमृत सेवितांच पावला । मृत्य राहो ॥ २५ ॥
२५) कामक्रोधांनी बरबटलेला माणूस चांगला असूंच शकत नाही. उदा. राहू वास्तवीक अमृत प्याला, तो अमर व्हायला हवा होता. पण कामक्रोधांमुळे अमर होण्याऐवजी मरुन मात्र गेला. 
आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें ।
परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥
२६) हा विषय बोलणें आतां पुरें. आपल्याला सोसेल, झेपेल तेवढेंच प्रत्येकाने दासबोधांतून घ्यावे. परंतु अहंकार बाजूस तें घ्यावें हे सगळ्यांत उत्तम होय.
मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें ।
तें सकळहि निरोपिलें । संकळीत मार्गें ॥ २७ ॥
२७) ' या ग्रंथांत काय सांगितले आहे ?"  असा श्रोत्यांनी प्रश्न केला होता. त्याचे उत्तर आतांपर्यंत थोडक्यांत दिले. 
आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तत्काळ ।
तुटे संशयाचें मूळ । येकसरां ॥ २८ ॥
२८) दासबोधाचा अभ्यास केला तर काय फळ तें आतां सांगतों. अभ्यास करणार्‍या माणसाचें वागणें एकदम बदलतें. त्याचे सारे संशय तत्काळ समूळ नाश पावतात.
मार्ग सांपडे सुगम । न लगे साधन दुर्गम । 
सायोज्यमुक्तीचें वर्म । ठांइं पडे ॥ २९ ॥
२९) ईश्र्वर दर्शनाचा सोपा व सुखाचा मार्ग सांपडतो. परमार्थ साधण्यासाठीं कठीण व कष्टदायक साधनांची जरुरी राहात नाहीं. सायुज्यमुक्तीचें रहस्य सहजपणें हातीं येतें. 
नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती ।
ऐसी आहे फळश्रुती । ईये ग्रंथीं ॥ ३० ॥
३०) या ग्रंथाच्या अभ्यासाचें खरें फळ असें आहे कीं, त्यानें अज्ञान, दुःख व खोट्या समजुती समूळ नाहींशा होऊन चटकन ज्ञानप्राप्ति होते.
योगियांचे परम भाग्य । आंगी बाणे तें वैराग्य । 
चातुर्य कळे यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥
३१) योगी पुरुष वैराग्याला मोठें भाग्य समजतात. तें वैराग्य माणसाच्या अंगी बाणतें.  तसेंच अंतर्यामीं विवेक उत्पन्न होतो आणि व्यवहारांत चातुर्यानें व प्रसंग पाहून कसें वागावें तें समजतें. 
भ्रांत अवगुणी अवलक्षण । तेचि होती सुलक्षण ।
धूर्त तार्किक विचक्षण । समयो जाणती ॥ ३२ ॥
३२) भ्रमिष्ट म्हणजे वेड्या व चुकीच्या समजुती किंवा कल्पना असणारी, दुर्गुणी आणि हीनलक्षणी माणसें उत्तम लक्षणी बनतात. दुसर्‍याची लबाडी ओळखण्याची धूर्तता अंगीं येते. तर्क चालविता येऊन सूक्ष्म विचार करतां येतो. तसेंच वेळप्रसंग जाणतां येतो. 
आळसी तेचि साक्षपी होती । पापी तेंचि प्रस्तावती ।
निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥
३३) आळशी माणसें उद्योगी बनतात. पापी माणसें पश्चाताप पावून पावन होतात. भक्तिमार्गाची निंदा करणारीं माणसें स्वतः आदरानें भक्ति करुं लागतात.
बद्धचि होती मुमुक्ष । मूर्ख होती अति दक्ष ।
अभक्तचि पावती मोक्ष । भक्तिमार्गे ॥ ३४ ॥
३४) प्रपंचीं गुंतलेल्या स्वार्थी माणसांना ईश्र्वरदर्शनाची इच्छा उत्पन्न होते. बेशिस्त माणसें व्यवस्थित वागूं लागतात. नास्तिक माणसें भक्तिमार्गानें चालून मोक्षापर्यंत पोंचतात.
नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती ।
प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥ ३५ ॥ 
३५) अभ्यासी मानसाचे अनेक दोष नष्ट होतात. अपवित्र माणसें पवित्र होतात. माणसाला उत्तम गति लाभते.               
नाना धोकें देहबुद्धीचे । नाना किंत संदेहाचे ।
नाना उद्वेग संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥
३६) " मी देहच आहे " या घट्ट समजुतीनें वागणार्‍याला जीवनांत अनेक कठीण प्रसंग येतात. दासबोधाच्या अभ्यासाने ते सगळे टळतात. तसेंच नाना प्रकारच्या संशयांनी निर्माण होणारे भ्रम नाहीसें होतात. संसारांतील दुःखाचे व निराशेचे अनेक प्रसंग लोपतात.
ऐसी याची फळश्रुती । श्रवणें चुके अधोगती । 
मनास होय विश्रांती । समाधान ॥ ३७ ॥
३७) दासबोधाच्या अभ्यासाचें हें फळ आहे. त्यानें जीवाची अवनति थांबते. माणसाच्या मनाला खरी विश्रांति व समाधान मिळतें. 
जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा ।
मत्सर धरी जो पुंसा । तयास तेंचि प्राप्त ॥ ३८ ॥
३८) वर सांगितलेले सर्व खरें आहें. परंतु अभ्यास करणार्‍याची मनोवृत्ति जशी असेल तसें फळ त्याला मिळेल. मत्सरवृत्ति व दोषदृष्टि ठेवून ग्रंथ वाचणार्‍याला तसेंच फळ मिळेल.
॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ग्रंथारंभलक्षणनाम समास पहिला 


Samas Pahila GranthaRambha 
समास पहिला ग्रंथारंभ



Custom Search

No comments: