Saturday, December 24, 2016

Dashak Dusara Samas Dusara Uttam Lakshan समास दुसरा उत्तम लक्षण


Dasbodha Dashak Dusara Samas Dusara Uttam Lakshan 
Samas Dusara Uttam Lakshan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us what the good qualities a person should have to identify him as a good person. These qualities help him to proceed on the path of spirituality. If anybody wishes to be a spiritual person then he should here this samas carefully and tries to acquire the missing qualities in him.
समास दुसरा उत्तम लक्षण
श्रीराम ॥
श्रोतां व्हावें सावधान । आतां सांगतों उत्तम गुण । 
जेणें करितां बाणे खुण । सर्वज्ञपणाची ॥ १ ॥
अर्थ   
१) श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. मी आता उत्तम गुण सांगतो आहे. जे अंगी बाणवल्याने प्रपंच व परमार्थ ह्या दोन्हीचे ज्ञान प्राप्त होईल.
वाट पुसिल्याविण जाऊं नये । फळ वोळखिल्याविण खाऊं नये ।
पडिली वस्तु घेऊं नये । येकायेकीं ॥ २ ॥ 
२) वाट (माहित असल्याशिवाय) विचारल्याशिवाय प्रवासास जाऊं नये. फळ ओळखिल्याशिवाय खाऊं नये. वस्तु पडलेली दिसली तर एकदम उचलून घेऊं नये.
अति वाद करुं नये । पोटीं कपट धरुं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कुळहीन कांता ॥ ३ ॥
३) फार वादावादी करुं नये. कपटीपणाने वागू नये. (बाहेरुन गोड परंतु पोटांत कपट असे वागूं नये.) कुलशीलाची नीट माहिती करुन घेतल्यावाचून मुलीशी लग्न करुं नये.
विचारेंविण बोलों नये । विवंचनेविण चालों नये ।
मर्यादेविण हालों नये । कांहीं येक ॥ ४ ॥
४) सारासार विचार केल्याशिवाय बोलू (न मागता सल्लासुद्धा) नये. कार्य सुरु करतांना सर्वांगीण बाजूंचा विचार केल्याशिवाय कार्य सुरु करु नये. नीतिअनीतिचा विचार केल्याशिवाय हालचाल करुं नये. 
प्रीतीविण रुसों नये । चोरास वोळखी पुसों नये ।
रात्रीं पंथ क्रमूं नये । येकायेकीं ॥ ५ ॥
५) प्रेम नसेल तेथे रुसणे नको. चोराला माहिती देऊं नये. अचानक रात्री प्रवास करु नये.   
जनीं आर्जव तोडूं नये । पापद्रव्य जोडूं नये । 
पुण्यमार्ग सोडूं नये । कदाकाळीं ॥ ६ ॥
६) लोकांशी सरळपणाने वागणे सोडूं नये. पापमार्गाने पैसा जोडूं नये. कधीही नीतिने वागणें सोडूं नये.
निंदा द्वेष करुं नये । असत्संग धरुं नये ।
द्रव्यदारा हरुं नये । बळात्कारें ॥ ७ ॥
७) कोणाचीही निंदा, द्वेष करुं नये. अयोग्य, वाईट लोकांशी संगत, मैत्री करु नये. दुसर्‍याची बायको किंवा पैसा बळात्कारानें लुबाडूं नये.
वक्तयास खोदूं नये । ऐक्यतेसी फोडूं नये ।
विद्याअभ्यास सोडूं नये कांहीं केल्यां ॥ ८ ॥
८) वक्त्याला प्रश्र्ण विचारुन हैराण करुं नये. एकीने राहणार्‍या लोकांत फूट पाडू नये. कांही झाले तरी विद्या-अभ्यास सोडू नये. (ज्ञान मिळवणे सोडूं नये). 
तोंडाळासीं भांडों नये । वाचाळासीं तंडों नये ।
संतसंग खंडूं नये । अंतर्यामीं ॥ ९ ॥
९) तोंडाळ लोकांशी भांडण करु नये. वाचाळ माणसाशी वादंग करुं नये. अंतर्यामी (मनांवर) झालेले चांगले संस्कार सोडूं नये.
अति क्रोध करुं नये । जिवलगांस खेदूं नये ।
मनीं वीट मानूं नये । सिकवणेचा ॥ १० ॥
१०) फार रागावू नये. जिवलग नातेवाईक, मित्र यांना दुखवूं नये. चांगले शिकून घेण्याचा कंटाळा करुं नये.     
क्षणक्षणा रुसों नये । लटिका पुरुषार्थ बोलों नये ।
केल्याविण सांगों नये । आपला पराक्रमु ॥ ११ ॥
११) सारखे सारखे रुसूं नये. खोटेपणा करुन न केलेली गोष्ट सांगू नये. काहीहीं न करता (आपला पराक्रम) आपण केले असे सांगू नये.  
बोलिला बोल विसरों नये । प्रसंगीं सामर्थ्य चुकों न.ये ।
केल्याविण निखंदूं नये । पुढिलांसी कदा ॥ १२ ॥
१२) आपण दिलेला शब्द विसरुं नये. योग्य प्रसंगी आपल्या शक्तिचा वापर करण्यास चुकू नये. कार्य करुन दाखविल्याशिवाय दुसर्‍याला कधीही बोल लावूं नये.
आळसें सुख मानूं नये । चाहाडी मनास आणूं नये ।
शोधिल्याविण करुं नये । कार्य कांहीं ॥ १३ ॥
१३) आळसांत पडून राहण्यांत सुख मानू नये. कोणाची चुगली-चहाडी करु नये. कोणतेही कार्य सर्वांगीण विचार केल्याशिवाय करुं नये.
सुखा आंग देऊं नये । प्रेत्न पुरुषें सांडूं नये ।
कष्ट करितां त्रासो नये । निरंतर ॥ १४ ॥
१४) देहाला अति सुखाची सवय लावूं नये. निरंतर प्रयत्न करण्याचे सोडूं नये. कधीही (आणि कितीही) कष्ट करावे लागले तरी त्रासून जाऊ नये.
सभेमध्यें लाजों नये । बाष्कळपणें बोलों नये ।
पैज होड घालूं नये । कांहीं केल्यां ॥ १५ ॥
१५) सभेमधे लाजूं नये. (धिटाईने वागावे.) परंतु वायफळ बडबड करु नये. कधीही (कसलीही) पैज लावूं नये. 
बहुत चिंता करुं नये । निसुगपणें राहों नये ।
परस्त्रीतें पाहों नये । पापबुद्धी ॥ १६ ॥
१६) फार चिंता करुं नये. आळशीपणांत दिवस घालवू नये. वाईट दृष्टीने दुसर्‍याच्या बायकोकडे पाहूं नये.
कोणाचा उपकार घेऊं नये । घेतला तरी राखों नये ।
परपीडा करुं नये । विस्वासघात ॥ १७ ॥
१७) कोणाच्या उपकाराचे ओझें बाळगूं नये. कोणी उपकार केल्यास तो फेडल्याशिवाय राहूं नये. दुसर्‍याचा विश्र्वासघात करुन त्याला पीडा देऊं नये.
शोच्येंविण असों नये । मळिण वस्त्र नेसों नये ।
जाणारास पुसों नये । कोठे जातोस म्हणौनी ॥ १८ ॥
१८) स्वच्छतेशिवाय राहूं नये. मलीन वस्त्र नेसूं नये. कोणी बाहेर जावयास निघाल्यावर त्याला कोठे जातोस म्हणून विचारु नये.
व्यापकपण सांडूं नये । पराधेन होऊं नये ।
आपलें वोझें घालूं नये । कोणीयेकासी ॥ १९ ॥
१९) आपला उदारपणा सोडू नये. कोणाच्या आधीन होऊं नये. परावलंबी किंवा दुसर्‍यावर आपले ओझें घालून राहू नये.
पत्रेंविण पर्वत करुं नये । हीनाचें रुण घेऊं नये ।
गोहीविण जाऊं नये । राजद्वारा ॥ २० ॥
२०) कागदपत्र केल्याशिवाय देण्या-घेण्याचे व्यवहार करु नये. हीन माणसाकडून कर्ज घेऊं नये. साक्षी-पुराव्याशिवाय कोर्टाची पायरी चढूं नये.
लटिकी जाजू घेऊं नये । सभेस लटिके करुं नये ।
आदर नस्तां बोलों नये । स्वभाविक ॥ २१ ॥
२१) खोटी हुज्जत घालूं नये. सर्व सभेला खोटे ठरवूं नये. ज्या ठिकाणी आपल्याला आदर-मान नाही तेथे बोलूं नये.
आदखणेपण करुं नये । अन्यायेंविण गांजूं नये ।
अवनीतीनें वर्तों नये । आंगबळें ॥ २२ ॥
२२) महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु नये. अन्यायाखेरीज कोणाला दुखवूं नये. अंगी फार शक्ती आहे म्हणुन दांडगेपणे वागूं नये.
बहुत अन्न खाऊं नये । बहुत निद्रा करुं नये ।
बहुत दिवस राहों नये । पिसुणाचेथें ॥ २३ ॥
२३) फार जेवण करुं नये. फार झोप काढूं नये. वाईट माणसाकडे फार दिवस राहूं नये.
आपल्याची गोही देऊं नये । आपली कीर्ती वर्णूं नये ।
आपलें आपण हासों नये । गोष्टी सांगोनी ॥ २४ ॥
२४) आपला म्हणून त्याच्या बाजूने साक्ष देऊं नये. आपल्या मोठेपणाचे आपणच प्रदर्शन करुं नये. गोष्टी सांगत आपले आपण हसूं नये.
धूम्रपान घेऊं नये । उन्मत्त द्रव्य सेऊं नये ।
बहुचकासीं करुं नये । मैत्री कदा ॥ २५ ॥
२५) धूम्रपान करुं नये. मादक पेय पिवूं नये. बोंबड्या माणसाशी मैत्री कधीच करुं नये.
कामेंविण राहों नये । नीच उत्तर साहों नये ।
आसुदें अन्न सेऊं नये । वडिलांचेंहि ॥ २६ ॥
२६) काम, उद्योग याशिवाय राहूं नये. कोणी अपमानास्पद (नीच) बोलला तर सहन करु नये. वडिलांचेही आयते अन्न खाऊं नये. 
तोंडीं सीवी असों नये । दुसर्‍यास देखोन हांसों नये ।
उणें अंगीं संचारों नये । कुळवंताचे ॥ २७ ॥
२७) तोडांत शिवी (घाणेरडी भाषा) असूं नये. दुसर्‍यास हासूं नये. कुळवान, शीलवान माणसाचे अंगी हीनपणा लावूं नये.
देखिली वस्तु चोरुं नये । बहुत कृपण होऊं नये ।
जिवलगांसीं करुं नये । कळह कदा ॥ २८ ॥
२८) पाहिलेली वस्तु (आवडली म्हणून) चोरु नये. फार कंजूषपणा करुं नये. आपल्या माणसांशी भांडण करुं नये. 
येकाचा घात करुं नये । लटिकी गोही देऊं नये ।
अप्रमाण वर्तों नये । कदाकाळीं ॥ २९ ॥
२९) कोणाचाही घात करुन त्याचे वाईट करुं नये. खोटी साक्ष देऊं नये. कधीही आपली वर्तणुक शास्त्राच्या विरुद्ध असूं नये. 
चाहाडी चोरी धरुं नये । परद्वार करुं नये ।
मागें उणें बोलों नये । कोणीयेकाचें ॥ ३० ॥
३०) कोणाची चहाडी, चोरी करुं नये. परस्त्रीशीं गैर (अनीतीने) वागू नये. कोणाच्याही मागे त्याच्याबद्दल वाईट बोलूं नये. 
समईं यावा चुकों नये । सत्वगुण सांडूं नये ।
वैरियास दंडूं नये । शरण आलियां ॥ ३१ ॥
३१) दुसर्‍यास मदतीची संधी सोडू नये. सत्वगुणाने वागणे कदापी सोडू नये. शरण आलेल्यास (चुकीची कबुली देणारास) शिक्षा करुं नये.
अल्पधनें माजों नये । हरिभक्तीस लाजों नये ।
मर्यादेविण चालों नये । पवित्र जनीं ॥ ३२ ॥
३२) कमी-अधिक पैसा मिळाला तरी त्याचे माजाने वागू नये. भगवंताची भक्ती करतांना लाजू नये. संत-महंत असलेल्या पवित्र ठिकाणी अमर्यादेने वर्तन करुं नये.
मूर्खासीं समंध पडों नये । अंधारीं हात घालूं नये ।
दुश्र्चितपणें विसरों नये । वस्तु आपुली ॥ ३३ ॥
३३) मूर्खांशी संबंध ठेवू नये. अंधार असलेल्या ठिकाणी हात घालूं नये. आपली वस्तु विसरण्याचा निष्काळजीपणा करुं नये.
स्नानसंध्या सांडूं नये । कुळाचार खंडूं नये ।
अनाचार मांडूं नये । चुकुरपणें ॥ ३४ ॥
३४) स्नान-संध्याआदि आपले आन्हिक सोडूं नये. कुलाचार सोडू नये. चुकारपणाने अनाचाराने वागूं नये. 
हरिकथा सांडूं नये । निरुपण तोडूं नये ।
परमार्थास मोडूं नये । प्रपंचबळें ॥ ३५ ॥
३५) हरिकथा, भजन, किर्तन आदि सोडूं नये.  प्रवचन निरुपण आदि सोडूं नये. प्रपंचाच्यामागे लागून परमार्थाची वाट सोडू नये.
देवाचा नवस बुडऊं नये । आपला धर्म उडऊं नये ।
भलतें भरीं भरों नये । विचारेंविण ॥ ३६ ॥
३६) देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपला धर्म विरोधी वागून सोडू नये.  विचाराने न वागता भलते काम अंगावर घेऊ नये. 
निष्ठुरपण धरुं नये । जीवहत्या करुं नये ।
पाउस देखोन जाऊं नये । अथवा अवकाळीं ॥ ३७ ॥
३७) निष्ठूरपणे वागू नये. जीवाची हिंसा करु नये. पाऊस असेल तर किंवा योग्य काळ नसेल तर प्रवासास जाऊं नये.
सभा देखोन गळों नये । समईं उत्तर टळों नये ।
धिःकारिता चळों नये । धारिष्ट आपुलें ॥ ३८ ॥       
३८) सभेमध्ये घाबरु नये. वेळप्रसंगी योग्य उत्तर देण्यास चुकू नये. कोणी धिःकारिले तरी आपले धैर्य गमावूं नये. 
गुरुविरहित असों नये । नीच यातीचा गुरु करुं नये ।
जिणें शाश्र्वत मानूं नये । वैभवेंसीं ॥ ३९ ॥
३९) गुरुशिवाय राहू नये. हलक्या जातीचा गुरु करु नये. वैभवाचे जीणे कायमचे समजू नये. 
सत्यमार्ग सांडूं नये । असत्य पंथे जाऊं नये ।
कदा अभिमान घेऊं नये । असत्याचा ॥ ४० ॥
४०) सत्याचा मार्ग सोडू नये. असत्याचे मार्गे जाऊ नये. खोट्या वागणुकीचा अभिमान बाळगू नये.    
अपकीर्ति ते सांडावी । सदकीर्ति वाढवावी ।
विवेकें दृढ धरावी । वाट सत्याची ॥ ४१ ॥
४१) अपकीर्तिच्या मार्गे जाऊ नये. सद्कीर्तिच्या मार्गे जावे. योग्य विचाराने सत्याचा मार्ग धरुन ठेवावा. (सत्कर्मे करुन सद्कीर्ति मिळवून देणारी सत्याची वाट घट्ट धरुन मार्ग चालावा.)
नेघतां हे उत्तम गुण । तें मनुष्य अवलक्षण ।
ऐक तयांचे लक्षण । पुढिले समासीं ॥ ४२ ॥
४२) जो कोणी हे उत्तमगुण अंगीकारत नाही, तो अवलक्षणीच होय. त्याची लक्षणे पुढील समासी ऐका. 

इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे उत्तमलक्षणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara Uttam Lakshan
समास दुसरा उत्तम लक्षण



Custom Search

No comments: