Tuesday, February 13, 2018

Samas Satava VishayaTyyga Nirupan समास सातवा विषयत्याग


Dashak Barava Samas Satava VishayaTyyga Nirupan 
Samas Satava VishayaTyyga Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us Vishaya Tyaga. There is a feeling in the minds of people that For succsess in Parmarth, one needs to make a sacrifice with the bodily pleasures. That is called as Vishaya Tyaga. Samarth is telling us about it.
समास सातवा विषयत्याग 
श्रीराम ।
न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें ।
मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥
१) अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणें लोकांना आवडत नाहीं. पण ज्याप्रमाणें पोटांत मळमळत असरांना जेऊ नये, त्याप्रमाणें मनांत शंका असतांना श्रवण करणें बरें नव्हें. 
बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले ।
विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥
२) पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करितात. पण स्वतः मात्र त्याचे सेवन करत जगतात. खरें म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाहीं.
बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक ।
येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥
३) बोलण्याचालण्याचा मेळ नसतो त्याला हीनविवेक म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाला सगळें लोक हसतात. 
विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं ।
ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥  
४) विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाहीं. असें सगळीकडे सांगितलेले आढळतें.  
प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती ।
उभयता सारिखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥
५) पण प्रश्र्न असा कीं प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात ? विषय सेवनाच्या बाबतींत दोघेही सारखेंच दिसतात.
देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं ।
याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥ 
६) मनुष्य जिवंत असेंपर्यंत विषय सुटणें अशक्य आहे. देह जिवंत आहे पण विषय सोडून दिला आहे असा कोणी या जगांत आहे का ? या प्रश्र्नाचे उत्तर गुरुदेवांनी आम्हाला द्यावें.
विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा ।
ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥
७) विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करतां येतो, असें म्हटलें तर फारच गोंधळ होतो.  
ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला ।
सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥
८) श्रोत्यानें आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्यानें तिचे निरसन केलें. वक्त्याचें म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनानें व त्या विषयांत लक्ष घालून ऐकावें. 
वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग ।
प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥
९) वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेंच  सर्वांगीण परमार्थ घडतो.  
मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहि बहुत कष्ट केले ।
तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥
१०) पूर्वीं जें मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठीं पुष्कळ कष्ट सोसलें. त्यानंतर तें जगांत महान झाले. 
येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं ।
कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥
११) बाकींचे प्रापंचिक लोक आपापसांत मत्सर करीत राहीलें. कांहीं अन्नानदशा होऊन मरण पावलें. तर कांहीं पोटासाठीं भ्रष्ट झालें.  
वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं ।
सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचे ॥ १२ ॥ 
१२) ज्या लोकांना अंगचे खरें वैराग्य नाही. स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाहीं. शुद्ध आचार नाहीं, भजनपूजन नाहीं, 
ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन ।
पाहों जाता अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥
१३) अशा प्रकारची माणसें सज्जन म्हणून मिरवून घेतात. पण खरें पाहिलें तर हा सज्जनपणा काल्पनिकअसतो. वास्तविक नसतो. 
जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप ।
क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥
१४) आपलें आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणें हें त्या माणसामचे एक महापापच समजावें. दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून त्यांच्या मनांत विक्षेप उत्पन्न होतो. त्यांचा मत्सर जागा होतो. 
मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना ।
खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥
१५) " जें मला नाहीं तें तुलाही शोभत नाहीं " हा मत्सराचा दृष्टीकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाहीं तो अन्न खाणार्‍याला निर्मळ मनानें पाहूं शकत नाहीं, त्यातलाच हा प्रकार आहे.  
भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाडखोर ।
सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥
१६) भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात. तशांततलाच हा प्रकार आहे. 
वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य ।
वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥
१७) वैराग्यासारखें भाग्य नाहीं. वैराग्य नसेल तें दुर्भाग्य होय. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीनें परमार्थ होत नाहीं.  
प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी ।
तो जाणीजे माहांयोगी । ईश्र्वरी पुरुष ॥ १८ ॥
१८) ज्याच्यापाशीं अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्यानें सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्र्वरी पुरुष असतो.  
अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करुन घेतली योगदीक्षा ।
घरोंघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥
१९) श्रीशंकर हा वैराग्याचा परम आदर्श आहे. आठ मोठ्या सिद्धिंना बाजूस सारुन श्रीमाहादेवानें योगदिक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो.  
ईक्ष्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी ।
म्हणोनिया सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥
२०) महादेवासारखा वेष धारण करणारा त्याची बरोबरी करुं शकणार नाहीं. म्हणून बाहेरुन सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखीं नसते. 
उदास आणी विवेक । त्यास शोधिती सकळ लोक ।
जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥
२१) जो अंतरी वैराग्यसंपन्न व विवेकी असतो अशा  पुरुषाला पुष्कळ लोक शोघीत येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विचेकहीन असतो असा भाग्यहीन दिनवाणें जीवन जगत असतो.   
जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्टले ।
विवेक करुं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥
२२) जी माणसें उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचारनें भ्रष्ट असतात, ती माणसें विषयांच्या लोभानें आत्मानात्मविचार करुं शकत नाहींत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो.  
भजन तरी आवडेना । पुरश्र्चर्ण कदापि घडेना ।
भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥ 
२३) त्यांना भजनपूजन आवडत नाहीं. त्यांच्या हातून पुरश्र्चरण कधीं घडत नाहीं. याच कारणाने त्यांचे संत-सज्जनांशी जमत नाहीं.    
वैराग्यें करुन भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना ।
वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥
२४) वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाहीं, ज्ञानी असून जो भगवमताचे भजन सोडत नाहीं, स्वतः विद्वान असून जो कधीं वादांत पडत नाहीं, अशीं माणसें फार थोडी आढळतात. 
कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके ।
जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥
२५) कष्ट केलें तर शेतांत उत्तम पीक येते. भारी वस्तु असेल तर ती बाजारांत लगेच विकली जाते. त्याचप्रमाणें जो विवेक व वैराग्य या दोन्हीनीं संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात.  
येर ते अवघेंचि मदले । दुराशेनें खोटे जाले ।
कानकोंडे ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥
२६) हें ज्यांच्यापाशीं नसते तें लोक निस्तेजपणें मागें पडतात. मनांत आशा वागवल्यानें तें खोटे पडतात. वैराग्यभ्रष्ट झाल्यानें त्यांचे ज्ञान मिंधें बनते. तें कानकोडे होतें.  
सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें ।
विषयत्यागाची लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥
२७) मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावें. शरीराचे धारण करण्यास जरुर तेवढेंच देहसुख सेवावें. विषयत्यागाची लक्षणें अशी आहेत हें ओळखून असावें.  
सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव ।
विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥
२८) हें झालें वैराग्य आतां विवेक ऐकावा. जें जेम कांहीं घडतें त्याचा कर्ता ईश्र्वर आहे. प्रकृतिच्या पसार्‍याला खरें अस्तित्व नाहीं. असा निश्र्चय अंतर्यामी 
स्थिर होणें हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यानांच हा विवेकाचा अर्थ बरोबर कळतो.   
शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर ।
कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥
२९) सर्व प्रसंगीं जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सर्वजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो, या दोघांची बरोबरी करतां येत नाहीं.  
त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे ।
पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथेयोग्य ॥ ३० ॥
३०) कशाचा त्याग करावा व कशाचा करुं नये हें जो शुद्ध तर्कानें जाणतो, आपण जसें बोलतो तसें वागण्याचें जो जाणतो, पिंडब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणें जाणतो,
ऐसा जो सर्व जाणता । उत्तमलक्षणी पुरुता ।
तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥
३१) असें सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो त्याच्या संगतीनें आपल्या आयुष्याचें सार्थक घडतें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे विषयत्यागनिरुपणनाम समास सातवा ॥
    Samas Satava VishayaTyyga  Nirupan 
   समास सातवा विषयत्याग 




Custom Search

No comments: